मराठी व्यावसायिक भाषांतराची तोंडओळख

२८ जानेवारी २०१९ रोजी ‘लँग्वेज सर्विसेस ब्युरो’ या संस्थेने “मराठी व्यावसायिक भाषांतराची तोंडओळख” हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागात आयोजित केला. लँग्वेज सर्विसेस ब्युरो च्या संस्थापिका सौ. माधुरी दातार व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. देवकी कुंटे यांनी मराठी व हिंदी विषयात बी.ए व एम.ए करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेची व्यावसायिक स्तरावर होणारी व सातत्याने वाढत असणारी भाषांतराची गरज आणि त्याचे महत्व याबद्दल मार्गदर्शन दिले.



सौ. देवकी कुंटे यांनी सादर केलेल्या प्रेझेंटेशनद्वारा विद्यार्थ्यांना भाषांतर म्हणजे काय, त्याची विविध क्षेत्रात असणारी गरज, शिवाय उत्तम भाषांतरकार होण्यासाठी अवगत असावी लागणारी कौशल्ये इत्यादींवर सखोल माहिती पुरविण्यात आली. तसेच त्यांनी ‘भाषांतर व्यवसाय’ हा खूप मोठा व्यवसाय असून त्याची गरज पुढील क्षेत्रात आहे, असे सांगितले.

  • विधीविषयक
  • तांत्रिक (टेक्निकल)
  • जाहिरात साहित्यिक
  • व्यापारविषयक/ व्यावसायिक
  • वैज्ञानिक कागदपत्र
  • दृकश्राव्य (ऑडिओ अँड व्हिज्युअल)
  • इतर – सगळ्या प्रकारची पुस्तके, संकेतस्थळे इ.


भाषांतरकाराला दोन्ही भाषांचे उत्तम ज्ञान व व्याकरणावर भक्कम पकड असणे आवश्यक आहे. लेखनाची, वाचनाची आवड असल्यास भाषांतर किती परिपूर्ण होऊ शकते तसेच संगणक ज्ञानाने कामाची वाढणारी गुणवत्ता इ. गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला.



कॅट टूल्स (CAT Tools - कॉम्प्युटर एडेड ट्रान्सलेशन टूल्स) या सॉफ्टवेअरच्या मदतीने भाषांतर कसे सुलभ होते, एक वाक्य एकदाच भाषांतरित होते आणि मेमरीमधे सेव झाल्याने भविष्यातील भाषांतराचा वेळ वाचतो हे थोडक्यात सांगितले.



इतकेच नव्हे तर या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून भाषांवर प्रभुत्व नसल्याने झालेली चुकीची आणि गमतीशीर भाषांतरांची उदाहरणेही त्यांनी दिली. या उदाहरणांमधून भाषांतराचे गांभीर्य त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.



“भाषांतरकाराची दिनचर्या नेमकी काय असते”? याबद्दलही त्यांनी संक्षिप्त स्वरुपात माहिती दिली. वाचन, शब्दावली संशोधन, लेखन, तज्ञाचे मार्गदर्शन व सल्ला, सखोल अभ्यास या गोष्टी भाषांतर करीत असताना समाविष्ट असतात, असे त्यांनी सांगितले.



इतके दिवस केवळ इंग्रजी भाषेलाच प्राधान्य देऊन अनेक क्षेत्रातील व्यवसाय चालू आहेत. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे जणू काही क्रांतीच झाली आहे. भारतातील ७५% लोक इंग्रजी न येणारे, त्यामुळे भारतीय भाषांचे महत्व वाढून भाषांतरकार व लेखकांची गरज वाढली आहे हा अतिशय महत्वाचा मुद्दा सौ. देवकी कुंटे यांनी मांडला.



कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून अनेक प्रश्न विचारण्यात आले व त्यांची समाधानकारक उत्तरे सौ. माधुरी दातार आणि देवकी कुंटे यांनी अगदी सोप्या शब्दात दिली. या कार्यक्रमाचा उद्देश हा आत्ताच्या पिढीमध्ये मराठी भाषांतराविषयी आवश्यक ती माहिती पुरवून, भाषाव्यवसायातील अनेक संधींची माहिती करून देणे असा होता.



Want to know more?

Get in touch with us today!

Contact Us